शेतकऱ्यांनो, अनेक दिवसांपासून आपण ज्या पीक विम्याची वाट पाहत होतात, तो विमा अखेर आपल्या खात्यांमध्ये जमा होऊ लागला आहे. “विमा मंजूर होणार का?”, “कधी होणार?”, “मिळाला तर किती मिळणार?” असे अनेक प्रश्न गेले कित्येक महिने शेतकऱ्यांच्या मनात होते. आता मात्र यावर उत्तर मिळू लागले आहे. शासनाच्या आदेशानुसार विविध जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू लागला आहे. या लेखात आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांना विमा मंजूर झाला, कुठे वाटप सुरू झाले, किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, कोणते जिल्हे अजूनही प्रतीक्षेत आहेत आणि केवायसी तसेच अतिवृष्टी अनुदान वाटपाबाबत काय स्थिती आहे. चला तर मग सविस्तर माहिती घेऊया.
नांदेड, जालना जिल्ह्यांत वाटपास सुरुवात
नांदेड व जालना जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झाल्याने या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागात याआधी काही प्रमाणात विमा मंजूर झाला होता, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे वाटप पुन्हा थांबवण्यात आले होते. आता मात्र शासनाने पुन्हा वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले होते. त्यामुळे हे जिल्हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत.
परभणी, हिंगोली जिल्ह्यांनाही मंजुरी
नांदेडप्रमाणेच परभणी व हिंगोली या जिल्ह्यांनाही पीक विमा मंजूर झाला आहे. हे तीनही जिल्हे अधिवेशनामध्ये घोषित करण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा होऊ लागले आहेत. यामुळे हजारो शेतकऱ्यांना थोडा तरी आर्थिक आधार मिळत आहे.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वैयक्तिक दावे स्वीकारले
जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसानीचे दावे दाखल केले होते. या दाव्यांची शासन स्तरावर तपासणी करण्यात आली. यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येही लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
इतर मंजूर जिल्हे – वाटपाच्या प्रतिक्षेत
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पीक विमा मंजूर झाला आहे. त्यामध्ये धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, धाराशिव, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वाटप सुरू झाले आहे, तर काही भागांमध्ये वितरण प्रक्रियेसाठी तयारी सुरू आहे.
१०२ कोटी रुपयांचा विमा वितरित होणार
शासनाच्या माहितीनुसार, सुमारे १०२ कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केला जाणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांनी केलेल्या वैयक्तिक दाव्यांच्या आधारे ठरवण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यामुळे हे दावे करण्यात आले होते. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे.
अकोला आणि जालना जिल्ह्यांतील काही शेतकऱ्यांना कमी रक्कम
अकोला आणि जालना या जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी विम्याची रक्कम मिळाली आहे. याचे कारण म्हणजे रँडम सर्व्हेच्या आधारे नुकसानाचे मूल्यांकन झाले. या पद्धतीत काही वेळा संपूर्ण नुकसान दर्शवले जात नाही. तसेच ‘व्हाइट स्पॉट’ अंतर्गत आलेल्या दाव्यांमध्येही असेच झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सोलापूर आणि अन्य प्रतीक्षेत असलेले जिल्हे
सोलापूर आणि राज्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पीक विमा वितरण सुरू झालेला नाही. परंतु शासनाकडून ही प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या मागण्या लक्षात घेता, ही गरज अधिक तातडीची बनली आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत अद्याप प्रतीक्षा
राज्य शासनाकडून अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हास्तरीय प्रशासनाने प्रस्ताव पाठवले. मार्च महिन्यापर्यंत अनेक शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली. मात्र अद्यापही त्यांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा झालेले नाही. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील याद्यांनुसार ही प्रक्रिया रखडलेली आहे.